मन:शांतीसाठी.
आजकाल धावपळीच्या युगात माणसाने आपले
मन:स्वास्थ्य गमावले आहे.मन:शांतीसाठी मंदिरे व वेगवेगळ्या आध्यात्मिक गुरूंचे
आश्रम धुंडाळले जात आहेत.त्यातून काहीच हाती लागत नाही आणि माणूस हळूहळू निराशेच्या गर्तेत लोटला
जात आहे.
खर तर “तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी!”
या उक्तीप्रमाणे मन:शांतीसाठी माणूस इकडे तिकडे
विनाकारण फिरत आहे असे करण्याची गरज नाही. मन:शांती साठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न
करून काही सवयी सोडल्या व काही सवयी अंगीकारल्या तर सुख आणि मन:शांती लाभणे फार दूर
नाही. यासाठी काही सुचना -
१.तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत कार्यवाही करताना भूतकाळातील कुणालातरी आलेला अनुभव
अथवा अपयशाची भीती यांचा विचार प्रथम करता,
ही सवय सोडा. यश मिळणारच आहे असा सकारात्मक विचार करून केलेले काम नेहमी यशाच्या
जवळ घेऊन जाते.तुमचा अनुभव हा तुमचा गुरु असतो.आत्मविश्वासाने केलेले काम नेहमी
मन:शांतीचे कारण असते.
२.तुम्ही समोरच्या व्यक्ती बद्दल बऱ्याचदा
पूर्वगृह मनात बाळगून वागता किंवा बोलता अशा तर्क करण्याच्या स्वभावामुळे आपली मन:शांती
तुम्ही गमावलेली असते. तेंव्हा मोकळ्या मनाने स्वत:शी व इत्तरांशी मुक्तपणाने संवाद साधा.
३.तुम्ही कोणतातरी न्यूनगंड बाळगत आयुष्य जगात असता एक लक्षात घ्या तुम्ही जसे
आहात तसे समाजाला आत्मविश्वासाने सामोरे
जा.स्वत:वर विश्वास ठेऊन केलेल्या कामातून निश्चितच आंतरिक समाधान मिळते
४.आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्याबरोबर ज्या प्रकारे बोलतात किंवा वागतात त्याचा
तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे अन्वयार्थ लावता व
विनाकारण मनस्ताप करून घेता. हे समजून चला की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे.समोरच्याच्या वागण्याचा
अर्थ लावण्यापूर्वी त्याच्या जागी स्वत:ला ठेऊन बघा,त्याची बाजूही समजून घ्या. गैरसमज नेहमीच मनस्वास्थ्य
बिघडवतात.
५.कुठल्याही गोष्टी बद्दल विनाकारण काळजी करायची सवय सोडून द्या. चिंता कटकटी
निर्माण करते व मानसिक शांततेचा भंग करते. जे आहे तसे
स्वीकारा.जे बदलू शकता ते बदलण्याचा प्रयत्न करा पण त्यासाठी अट्टाहास मात्र करू नका.
६. तुम्ही निकोप मनाने दुसऱ्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. वाईटातही
चांगले शोधायची सवय लावा.
७.संवेदनाशील रहा.समोरच्याच्या मनाचा विचार प्रथम करा.तुम्ही आजूबाजूच्या
लोकांच्या भावनांचा आदर करू लागलात की वेगळे मानसिक समाधान मिळेल.माणसांप्रमाणेच निसर्गालाही भावना असतात याची जाणीव ठेवा.
८.तुमच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवा.मनाची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसायला
हवी.
९.आपला आनंद एक दुसऱ्यात वाटून घ्या व स्वत:बरोबरच इत्तरांना आनंदी ठेवण्याचा
प्रयत्न करा.
१०.जे घडते आहे ते जसे आहे तसे विना अवरोध अति चिकित्सा न करता आनंदाने
स्वीकारण्याची सवय तुम्ही लाऊन घ्या.
लक्षात घ्या- मन ठेवा रे प्रसन्न
सकल सिद्धीचे कारण!
प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment