Tuesday, June 24, 2014

नातेसंबंध

                            नातेसंबंध               

                       सर्वगुणसंपन्न माणुस ही अशक्य गोष्ट आहे !मला असे वाटते की प्रत्येक माणुस वेगळा असतो.अनेक चांगल्या गुणांबरोबरच काही अवगुणही माणसात असतातच! पण एकदा का स्नेहबंध तयार झाले की अशा व्यक्तीमधील सर्व गुणदोषासहीत स्विकारणे अपेक्षित आहे . एकमेकातल्या चांगुलपणाच्या पायावर असे नातेसंबंध टिकवले जातात.एकमेकाला सांभाळुन घेण्याची व्रूत्ती जोपासली जाते आणि मग आपोआपच प्रत्येकजण आत्मपरिक्षण करून आपल्यातले वाईट दूर करायचा प्रयत्न करायला लागतो आणि निकोप स्नेहाच्या नात्याना बळकटी येते.येथे गरज असते ती संबंधितांकडून सकारात्मक सपोर्टची !
                                                                                           ..........................प्रल्हाद दुधाळ.

शाकाहारी


                                                         शाकाहारी 

                  अनेक लोक वेगवेगळी व्रतवैकल्ये करतात, फक्त शुध्द शाकाहारच घेतात. देवाची कडक उपासना करतात. पण बोलताना त्यांच्या प्रत्येक शब्दात विखार भरलेला असतो! दिवसभर अनेकांशी ते कटू व शिवराळ भाषेत बोलत असतात. आपल्या बोलण्याने अनेक जित्याजागत्या माणसांची मने दुखावण्यात त्यांना असुरी आनंद मिळतो. अशाच प्रकारचे अनेक लोक सकाळी सोवळ्यातली साग्रसंगीत पूजा करतात आपण चिटपाखराला सुध्दा दुखावत नाही, शुध्द शाकाहारी आहोत असे टिमकी वाजवतात पण नोकरी /व्यवसायाच्या ठिकाणी गोरगरीब जनतेला लुबाडतात, भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवतात.दिवसभर लोकाना वेठीला धरून अप्रत्यक्षपणे लोकांचे रक्त पिणाऱ्या अशा लोकाना शाकाहारी म्हणायचे का?
                                                                                                        .......प्रल्हाद दुधाळ.

“अती झाल हसू आलं!”

                         

                                                      अती झाल हसू आलं!”

    माझ्या मित्राने-रफिकने पुण्यातल्या एका उपनगरात चायनीज फूड चे एक छोटेसे हॉटेल सुरू केले त्याला आता एक वर्ष होवून गेले होते. हॉटेलच्या ओपनिंगला मी अगदी आवर्जून उपस्थित होतो.रफिकने आत्तापर्यंत खूप कष्टात दिवस काढले होते. चार पाच वर्षे जमवाजमव करून त्याने या व्यवसायात पदार्पण केले होते.माझा एक मित्र धंद्यात स्थिर होवू पहात होता याचा नक्कीच आनंद होता.
 मधल्या काही दिवसात माझे त्या भागात जाणे झाले नाही.एक दिवस निवांत होतो म्हटलं रफिकच हॉटेल कसं चाललय बघू या.संध्याकाळी त्याच्या हॉटेल वर गेलो.रफिकचे या व्यवसायात चांगलेच बस्तान बसले होते.त्याने माझे उत्साहाने स्वागत केले.मागच्या बाजूला आमची गप्पांची महफिल जमली.चायनीज हॉटेल चांगले चालते आहे पण या धंद्यात काही त्रासही होतात असे तो सांगत होता.त्याने  सांगितलेला  हा किस्सा आहे       
      दररोज संध्याकाळी ठराविक वेळी त्याचे हे हॉटेल रफिक उघडत असे.पहिल्या दिवसापासूनच त्याने पदार्थांच्या क्वालिटीकडे तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले होते त्यामुळे त्याच्या हॉटेलवर त्याच्या हातचे टेस्टी चायनिज पदार्थ खायला दररोज रात्री उशिरापर्यंत लोकांची भरपूर गर्दी व्हायची.शहराबाहेर त्याचे हे हॉटेल होते त्याने कुठल्या सरकारी परवानग्या घेतलेल्या नव्हत्या त्यामुळे कायद्याच्या भाषेत तसा तो अनधिकृत धंदा होता. तो असा अनधिकृत धंदा करत असल्याने नगरपालिका कर्मचारी,आरोग्य खात्याचे लोक व पोलिस त्याच्याकडून नियमितपणे हप्ता घेउन जायचे.त्यामुळे तो आपला हा धंदा निर्वेधपणे करु शकत होता.असा धंदा करायचा तर या गोष्टी करायलाच लागायच्या!
      तर असाच एक दिवशी रफिक रात्री उशिरापर्यंत आपला धंदा करत होता रात्री साडे अकरा च्या दरम्यान पोलिसांचे गस्तीपथक पोलिस व्हॅन मधुन तेथे आले.आजच नव्याने रुजु झालेले साहेबही गाडीत होते. नेहमीचे  आर्थिक व्यवहार झाल्यावर साहेबाने एक चायनिजचे पार्सल बांधुन दे असे रफिकला  फर्मान सोडले.साहेबाने सांगितलेल्या डिश चे पार्सल घेउन (अर्थात फुकट ) घेउन साहेबाची गाडी गेली.
    दुसऱ्या दिवशी त्याच वेळी पुन्हा पोलिसांची गाडी आली.साहेबाच्या बायकोला ती डिश खुपच आवडली होती, त्यामुळे आजही साहेबाने पार्सलची ऑर्डर दिली होती.रफिकने त्या दिवशीही पार्सल दिले.आणि मग हा दररोजचा उद्योग झाला! रफिक वैतागुन गेला.दररोज हा नवा भुर्दंड चालू झाला होता.पोलिसांशी वाकडे नको हा विचार करून  दररोज रफिकला पार्सल तयार ठेवण्याचा आदेश पाळावा लागत होता.हे असेच चालत राहिले.रफिक ही ब्याद कशी टाळता येईल याच्यावर खूप दिवस विचार करत होता पण काय करावे ते त्याला सुचत नव्हते. एक दिवस मात्र त्याला एक युक्ती सुचली.त्या दिवसा पासून रफिक अजिबात न कुरकुरता अत्यंत आनंदाने साहेबाचे पार्सल तयार ठेवायला लागला! एक दिवस साहेबानी गाडीतून उतरून  त्याच्या डिश चे कौतुक केले,साहेब त्याला म्हणाले की "पुर्वी पेक्षा तुझ्या डीशची चव खुपच छान झाली आहे! मॅडम तर जाम खुश आहे तुझ्या कौशल्यावर!" रफिक साहेबांकडे बघून कसनुस हसला! साहेब नेहमी प्रमाणे फुकटचे पार्सल घेउन गेले!”
आता माझी उत्सुकता चाळवली गेली.
“असं काय केलंस रे रफिक तू ,की आनंदाने साहेबाला पार्सल द्यायला लागलास?”
       तुम्हाला काय वाटत? काय खास बदल केला असेल रफिकने, की त्याच्या त्या  डिशची चव एकदम एवढी फर्मास झाली असेल? मला तर काही सुचतच नव्हते.मी  सांग म्हणून खूपच आग्रह धरला तेंव्हा त्याने त्याचे ते सिक्रेट मला सांगितले, रफिक म्हणाला
 “तू माझा मित्र म्हणून हे तुला सांगतोय,तू मात्र हे तुझ्या जवळच ठेव.”
मी होकारार्थी मान डोलावली.
" या नव्या साहेबाच्या दररोजच्या पार्सल च्या मागणीवर मी वैतागुन एक उपाय शोधला. काय व्हायचं की माझ्याकडचे बरेच गिर्हाईक मागवलेले पदार्थ अर्धवटच खायचे व डिशमध्ये बरेच उष्टे अन्न  तसेच सोडुन जायचे.मग मी काय केले की  असे उरलेले अन्न मी एका वेगळ्या भांड्यात काढायला सुरुवात केली. साहेबाची गाडी येण्याच्या सुमारास मी हे मिश्रण गरम करुन साहेबाचे पार्सल तयार करायला लागलो व त्याला देउ लागलो! आता तर साहेबाला व त्याच्या बायकोला हीच डीश आवडते !"
दररोज न चुकता गाडी आजही पार्सल घेउन जात आहे.
मी तुम्हाला म्हणून हे सांगतोय,प्लीज कुणाला सांगू नका,काय?
                                                                                              ...........प्रल्हाद दुधाळ.पुणे.

जातीभेद.

                                            मला वाटते की वर वर मी जात मानत नाही असे म्हणणारे लोकही स्वत:ची जात कुरवाळत असतात.भारतीय माणुस फक्त परदेशात असला की भारतीय असतो.परराज्यात असला की त्याचा राज्याबद्द्ल अभिमान जागा होतो आणि मग त्याच क्रमाने जिल्हा तालुका व गावाचा गर्व दाखवला जातो पण समाजात वावरताना मात्र धर्म आणि जातीवर जातो.फेसबुक सारख्या माध्यमातही असे जातीनिहाय कळप तयार झाले आहेत .जोपर्यंत सर्व सरकारी कागदपत्रातुन जातीचा रकाना नष्ट होत नाही तोपर्यंत जाती व जातीभेद नष्ट होणे अवघड आहे.
                                                                                           .........प्रल्हाद दुधाळ 

माणसाची जडणघडण.

                                                    माणसाची जडणघडण.
           सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती जेंव्हा लोकांच्या दृष्टीने वावगी वागायला लागते तेंव्हा  ती व्यक्ती बिघडली असे  म्हटले  जाते.त्या व्यक्तीच्या  अशा बिघडण्याच्या कारणांची चर्चाही समाजात अगदी चवीने होत रहाते.अशा वेळी त्या वाया गेलेल्या माणसाच्या आईवडीलांचा, झालेल्या संस्कारांचा,त्याच्या संगतीचा उध्दार होतो.गोष्ट इथेच थांबत नाही तर ज्या वस्तीत त्याचे पालनपोषण झाले त्या वस्तीला,तो ज्या  गावात रहातो त्या गावालाही बदनाम केले जाते! अशावेळी लोक अगदी सहजपणे बोलतात-
"त्या वस्तीत रहातो ना तो,मग बिघडणारच ! दुसरे काय होणार?
किंवा “ते गावच तसले, तिथले संस्कारच वाईट!” ”खाण तशी माती!” असेही लोक बोलतात.सगळा दोष संस्कारांना दिला जातो!
   एकंदरीत माणसाच्या जडणघडणीचा वरवर अभ्यास केला तर असे आढळते की,माणसाच्या वागण्याबोलण्यावर विचारप्रक्रियेवर त्याचे आईवडिल,शेजारी,मित्रमंडळी या बरोबरच दैनंदिन आयुष्यात त्याचा ज्यांच्या  ज्यांचाशी  संपर्क येतो अशा माणसांचा जाणते  अजाणतेपणी परिणाम होत असतो. यालाच आपण संस्कार असे नाव देतो!
 हे संस्कार ज्या पध्दतीने होतात तशीच त्याची जडणघडण होत असते.चांगले संस्कार चांगले शिक्षण मिळाले तर जीवनाला योग्य पद्धतीने गती मिळते पण यापैकी एका घटकाचा जरी वाईट प्रभाव पडला तरी त्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो.म्हणजेच माणसाचे घडणे वा बिघडणे,त्याची जडणघडण ही त्याच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते.
       हे गृहीतक काही अंशी बरोबर असेलही,पण मला वाटते की, हे अर्धसत्यच आहे,कारण बहुतांश लोकांच्या बाबतीत जरी हा ठोकताळा बरोबर असला तरी आपण समाजात बरीच अशी माणसे पहातो की त्यांना लहानपणापासून कोणत्याही प्रकारचे सुसंस्कार मिळालेले नाहीत,अत्यंत विपरीत परिस्थितीते रहात आहेत,त्यांच्या आजूबाजूला अत्यंत प्रतिकूल वातावरण आहे तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीचा कोणताही अनिष्ट परिणाम न होता,ते त्या दलदलीमधून कमळासारखे फुलतात! एक यशस्वी सुसंस्कारित व्यक्ती म्हणून समाजात आपले स्थान ते निर्माण करतात.आपली समाजात वेगळी ओळख तयार करतात!समृद्धी प्रतिष्ठा व कीर्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत असते.याचाच दुसरा अर्थ असाही होतो की,फक्त चांगले संस्कार अथवा आजूबाजूचे वातावरण माणसाला चांगला किंवा वाईट ठरवू वा बनवू शकत नाही!
      मला असे मुळीच म्हणायचे नाही की चांगले संस्कार महत्वाचे नाहीत.चांगल्या संस्काराचा माणसाच्या जडण घडणीत महत्वाचा वाटा आहेच, पण माणसामधील जन्मत: असलेली आंतरिक समज व प्रगतीसाठीची जिद्दही त्याच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची आहे !अत्यंत दरिद्री अशिक्षित सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या समाजात जन्म घेऊन व त्याच वातावरणात पालनपोषण होऊनही चिखलात उमलणाऱ्या कमळाप्रमाणे काही व्यक्तीमत्वे त्यांच्यातल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या व स्वप्रयत्नाने समाजात नाव कमावतात. एक यशस्वी व कर्तबगार माणूस म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते! आपल्या आजूबाजूलाअसलेल्या आजच्या अशा यशस्वी लोकांचा,उद्योगपती,शास्रज्ञ विचारवंत,लेखक,कवी,वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ, यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आढळेल की यातल्या अशा अनेक व्यक्ती अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांच्या आजच्या पदावर पोहोचल्या आहेत! कोणतेही सुनियोजित संस्कारपद्धतशीर शिक्षण न घेताही अनेक माणसे आयुष्यात यशस्वी झालेली दिसतात.अशा माणसांचे जीवन सर्वसामान्यांसाठी कायम आदर्शवत असते.
    याच्या उलट परिस्थितीही आपल्याला समाजात पहायला मिळते.अगदी उच्चशिक्षित संस्कारित घरात वाढलेली, परिस्थितीची कोणतीही झळ न लागलेली,अत्यंत चांगल्या वातावरणात वाढलेली व्यक्तीसुध्दा वाममार्गाला लागलेली दिसते.सामाजिकदृष्ट्या बिघडलेल्या व्यक्तींमध्ये तथाकथित संस्कारित कुटुंबातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाणही नक्कीच विचार करायला लावणारे आहे.
                 
याचाच अर्थ असा की माणसाच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण केवळ तो कोणत्या कुटुंबात जन्माला आला, त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झाले,कोणत्या आर्थिक वा सामाजिक परिस्थितीत तो राहिला/वाढला,तो काय खातो, कुणाबरोबर व कशा प्रकारच्या घरात रहातो यावर अवलंबून नाही तर या सर्व परिस्थितीबरोबरच त्या माणसाची  आंतरिक समज व परिस्थितीवर मात करण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती त्या व्यक्तीला एक आदर्श माणूस बनवू शकते! आपण कुणाच्याही पोटी जन्म घेतलेला असू दे ,कोणत्याही जाती धर्मात आपण जन्म घेतलेला असुदे, घरची आर्थिक परिस्थिती कशीही असू दे ,कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत तुम्ही वाढलेले असू देतुमची जर कष्ट करण्याची मानसिक तयारी व समोर येणाऱ्या कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अंगी असेल तर अशा इच्छाशक्तीच्या जोरावर असा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचणे सहज शक्य आहे! एक चांगला माणूस होण्यासाठी जात,धर्म,आर्थिक परिस्थिती,चांगले शिक्षण,उत्तम संस्कार,चांगली संगत एवढेच पुरेसे नाही या सर्व गोष्टी अनुकूल असो अथवा नसो पण  एक चांगला माणूस होण्यासाठी तुमच्याकडे एक चांगले संवेदनशील मन आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून भरारी घेण्यासाठीची जिद्द मात्र नक्की असायला हवी.तुमच्याकडे असलेले  हे चांगले मन जगातील चांगले गुण,चांगले संस्कार,परोपकार व आदर्श यांना आकर्षित करते आणि या चांगल्या मनाच्या  व जिद्दीच्या जोरावर तुमचे एका आनंदी यशस्वी संवेदनशील माणसात परिवर्तन अगदी सहजपणे होऊ शकते! आत्मविश्वास व प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न वाल्याला  वाल्मिकी बनवू शकतात तर त्याच पध्दतीने तुम्ही एक आनंदी उत्साही व संवेदनशील माणूस बनायला काय हरकत आहे?
 निश्चितच असे होऊ शकते!
तर करायची सुरू ही आनंदयात्रा?   
    
                                   
                                        ....................प्रल्हाद दुधाळ.
                                                              ५/९ रुणवाल पार्क
                                                              मार्केट यार्ड पुणे ३७
                                                                 (९४२३०१२०२०)

Monday, June 16, 2014

विनाशक क्रोधभावना.

                                                            विनाशक  क्रोधभावना.
                              या विविधरंगी  जगात वावरताना आजूबाजूला असे काही प्रसंग घडतात ज्यामुळे आपणास खूप राग येतो. आलेल्या प्रचंड रागामुळे आपण सारासार विचार न करता प्रतिक्रिया देतो. रागाच्या भरात आपण समोरच्या माणसाला वाट्टेल तसे बोलतो,त्यांचा अपमान करतो.समोरची व्यक्ती सुध्दा तुमच्या सारखीच कोपिष्ट असली तर असे वाद शाब्दिक न रहाता प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. दोधेही मग आपले सर्व संस्कार विसरून हीन पातळीवर जातात.काही वेळा असे टोकाचे वाद कायमच्या दुष्मनीत रुपांतरीत होतात.अगदी पिढ्यान पिढ्यांचे हाडवैराचे स्वरूप या दुष्मनीला येते, याउलट कधी कधी आपल्या स्वत:च्या हातून अशीच चूक होते व कुणाचा तरी तेजोभंग होतो अशा दुखावलेल्या समोरच्या माणसाच्या रागाचे आपण बळी होतो. ठोश्याला ठोश्याने उत्तर द्यायची भाषा बोलली जाते व द्वेष भावना वाढत जाते.अशा प्रकारच्या वैमनस्यासाठी फार मोठी कारणे असतीलच असे काही नाही कधी कधी तर अगदी किरकोळ व हास्यास्पद कारणाने सुध्दा दोन व्यक्ती कायमचे वैरी होऊन आयुष्यभर भांडत रहातात. स्वत:चे आयुष्य तर बरबाद करतातच पण आपल्या परिवाराचे आयुष्यसुध्दा पणाला लावतात! खोट्या प्रतिष्ठेपायी अशा केसेस पिढ्यानपिढ्या कोर्टात लढल्या जातात.आपली एनर्जी व पैसा दोन्हींची बरबादी होत रहाते.अशा दुष्मनी निभावण्याचे भूत का एकदा मानगुटीवर बसले की माणसाला दुसरे काही सुचतच नाही.साम दाम दंड भेद असे सर्व पर्याय आपल्या वै-यावर सूड उगवण्यासाठी वापरले जातात.असे करताना आपले वयक्तिक नुकसान होत आहे हे अशी माणसे विसरूनच जातात. एक प्रकारच्या नशेतच अशी माणसे वावरत असतात.
                 अशा प्रसंगी दोन्ही बाजूंनी थोडी समजदारी दाखवली तर माफी मागून व माफ करून वैमनस्य टाळता येऊ शकते. एकमेकांवर निशाणा साधून आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे यावर एकदा दोन्ही व्यक्तींनी विचार करायला हवा. क्रोधाच्या अवस्थेत सारासार विवेकबुध्दी काम करत नाही त्यामुळे रागाची भावना असताना कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळणे कायमच   शहाणपणाचे ठरते. भावनेच्या भरात घेतलेले बहुतांश निर्णय पुढच्या आयुष्यात पश्चातापाची वेळ आणतात.आपल्या आयुष्यात आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे.आपल्या जीवनाचे अंतिम इप्सित काय आहे याची जाणीव असलेला माणूस कधीही असा आततायीपणा करणार नाही.आपल्या धेय्याकडे वाटचाल करताना योग्य तेथे दुराभिमान बाजूला ठेऊन आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही अशा प्रकारे तडजोड करायला अशा माणसाची तयारी असते.खोट्या प्रतिष्ठेपायी नको त्या गोष्टीना अवाजवी महत्व असे लोक देत नाहीत. समोर जर एकमेकाना भिडण्याची परिस्थिती तयार झाली तर वैमनस्याऐवजी सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याला प्राधान्य असले पाहिजे.बदल्याची भावना पाळण्या ऐवजी योग्य तेथे बदलण्याचा दृष्टीकोन अंगी यायला हवा.हा बदल होण्यासाठी प्रथम आपल्या भावनांवर नियंत्रण आणायला हवे .पण हे काम सोपे मुळीच नाही .हा बदल कसा घडू शकेल?
                 भावनांवर ताबा ठेवायला शिकण्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखायला शिकले पाहिजे .आपली बलस्थाने व  आपल्यातला कमकुवतपणा यांची ओळख व्हायला हवी .कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देतात तर कोणत्या प्रसंगी आपल्या भावनांचा स्फोट होतो याचा  पध्दतशिरपणे स्व अभ्यास करायला हवा रागावर नियंत्रणासाठी ज्या परिस्थितीत राग येतो ती परिस्थिती निर्माणच होणार नाही असे पहावे लागेल .कुठल्या परिस्थिती मधे आपली मनस्थिती प्रसन्न असते याचे निरिक्षण करायला हवे आपल्यात असणारे दोष दूर करण्यासाठी जरुर तर योग्य त्या समुपकदेशकाची मदत घ्यायला हवी व योग्य ते उपचार करायला हवेत.समोरची व्यक्ती तुम्हाला अनुकुलच वागायला हवी हा दुराग्रह सोडुन द्यायला हवा .समोरच्या व्यक्ती च्या भुमिकेत जाउन विचार करता यायला हवा आणि  एकदा का  दुसर्याच्या मनाचा विचार करता आला की वादाचे प्रसंग आपोआप टाळता येतील .समस्या हाताळताना सामोपचाराची पध्दत वापरली तर नक्कीच सर्वमान्य मार्ग निघू शकतो .कधी अशीही परिस्थिती समोर येवु शकते की तेथे तोडग्याचा पर्यायच  उपलब्ध नाही अशावेळी उगाच आकांडतांडव न करता थंड डोक्याने ,मुध्देसुद पध्दतीने कायदेशीर सल्ला घेउन प्रकरण हाताळता येते .विचारपुर्वक केलेली कृती सहसा पश्चातापाची वेळ आणू देत नाही त्यामुळे आत्मविश्वासाने विचारपुर्वक निर्णय घेउन क्रोधाचे प्रसंग टाळायला हवेत . वितंडवादाने संबंध सुधारण्यापलिकडे बिघडतात तर तड्जोडीने आदर पुर्वक मार्ग निघतात असे वाटते त्यामुळे आपल्या आरोग्याला खुपच धोकादायक असलेली क्रोधभावना व त्यापोटी होणारे मनोकायिक परिणाम टाळणे कधिही चांगले .कारण आयुष्यात सर्वात महत्वाचे आहे ते आपले आनंदी जीवन!
                                                                              ............प्रल्हाद दुधाळ.

.
                              

Saturday, June 7, 2014

मोठ्या मनाची माणस!

मोठ्या मनाची माणस!
मनाने मोठे असलेल्या माणसांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी वागताना अशी माणसे खूप चांगले वागतात.समोरच्या माणसाचा पूर्ण आदर करून गरजू व्यक्तीच्या भल्यासाठी काय काय करता येऊ शकेल याचा विचार ते प्रथम करतात व तशी कृतीसुध्दा संबंधिताकडून केली जाते! अशावेळी त्यांच्या मनात समोरच्या व्यक्ती बद्दल केवळ माणुसकी व सदभावना असते, भले समोरच्या व्यक्तीच्या मनात त्यांच्या विषयी काहीही भावना असोत! अनेकदा अशी माणसे स्वमत बाजूला ठेऊन केवळ इत्तर माणसांच्या मताचा आदर करण्यासाठी प्रसंगी स्वत:चे मन मारून वा पडती बाजू घेऊन, तडजोड करतात.येथे त्यांच्या मनात समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचा वास्तविकतेपेक्षा मन सांभाळण्याचा प्रयत्न असतो.उपकाराची भावना तर मुळीच नसते.असे करताना प्रसंगी ते मनाचा मोठेपणा दाखवून दुसऱ्याच्या चुका पोटात घालतात व अजाणतेपणे झालेल्या चुकांबद्दल प्रतिष्ठेचा प्रश्न न करता विनाशर्त माफीही मागतात. अशावेळी त्या माणसाच्या लेखी महत्व असते ते फक्त नाते संबंधाला! नाती टिकवण्यासाठी व नात्यांच्या संगोपनासाठी तन,मन व प्रसंगी धनही खर्च करण्यास अशी मोठी माणसे सदैव तत्पर असतात. बऱ्याचदा अशा माणसांना त्यांनी दाखवलेल्या मनाच्या श्रीमंतीचा पत्ताही नसतो! कुणी जाणीवपूर्वक त्यांचे आभार मानायचा प्रयत्न केला तर ते “हे आपण कुणावर उपकार केलेले नसून केवळ कर्तव्य केल्याचे सांगतात!” पण वास्तव जगात असे जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारे क्वचितच आढळतात. जास्त करून अशा माणसांचा स्वत:च्या स्वार्थासाठी पद्धतशीरपणे उपयोग करून घेणारेच त्यांच्या आजूबाजूला वावरत असतात, पण त्या माणसाला या परिस्थितीची मुळीच जाणीव नसते.तो आपल्या कर्तव्य भावनेने व विश्वासाने सर्वाना अशी मदत करत रहातो. तो त्याच्या सहज सुलभ वागणुकीचा भाग असतो व नंतर तोच त्यांचा स्वभाव बनतो! आजूबाजूची माणसे त्याचे तसे वागणेच गृहीत धरायला लागतात. त्याचेकडून कायमच तसेच वागणे अपेक्षिले जाते पण माणूस मनाने कितीही मोठा असला तरी व्यावहारीक जगामध्ये एक ना एक दिवस वयक्तिक कारणामुळे अथवा अन्य काही कारणामुळे त्याला कायमच तसे वागता येत नाही.आणि त्याच्या वेगळ्या वागण्यामुळे त्याला विचित्र प्रतिसाद मिळायला लागतात.या प्रतिक्रीया इतक्या टोकाच्या असतात की आपल्या उदार वागण्यातला फोलपणा त्याला कळून येतो, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो! अशा माणसांच्या मनातील भावना किंवा त्याला आलेल्या समस्या जाणून घेण्याची कुणाला कधी गरजच वाटलेली नसते किंवा तशी कुणी तसदीही घेतलेली नसते! आणि मग एक दिवस असा उजाडतो की आजूबाजूंच्या माणसांच्या भावनिक,आर्थिक वा अजून कोणत्याही प्रकारच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. सगळ्यात शेवटी एक माणूस म्हणून असलेल्या मर्यादामुळे हे घडणे अगदी साहजिक आहे! मग लोकांची गृहीतके बिघडायला लागतात व त्या माणसाकडून थोडे वेगळे वागले जाताच लोकांसाठी तो एक अपेक्षाभंग ठरतो.त्या व्यक्तीच्या खऱ्या परिस्थितीची शहानिशा न करता मग नको त्या वावड्या उठायला लागतात! त्याच्या वागण्याचे वेगळे वेगळे अर्थ लावले जातात.त्याला बदनाम केले जाते. असे वारंवार घडत राहिले की लोक अगदी सहज अशा व्यक्तीबद्दल म्हणायला लागतात-.
”तो आता बदलला बर का!”
थोडक्यात माणसे खूप कृतघ्न असतात!
खर तर ती व्यक्ती जशी होती तशीच असते! त्याच्या मजबुरीमुळे त्याने आपल्या वागण्यात तात्पुरता बदल केलेला असतो.थोडक्यात तो फक्त समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलेला नसतो.या एकाच कारणाने आधी त्याने केलेले अनंत उपकार विसरून त्याच्याबद्दलचा बघण्याचा दृष्टीकोनच माणसाने बदलून टाकलेला असतो! अशा स्वार्थी लोकांना याचे भान रहात नाही की कोणत्याही व्यक्ती बद्दल मत बनवताना, त्याचेबद्द्ल कुठलीही टिपण्णी करताना, थोडं स्वत:च्या वागण्याचाही प्रामाणिकपणे विचार करायला हवा! आपल्या या वागण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्या उपकार कर्त्याला बदनाम करणाऱ्या अशा माणसानी नीती अनीतीचे सगळे संकेत गुंडाळून ठेवलेले दिसतात. केवळ आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून जग वाईट असल्याचा कांगावा असे लोक करतात.
मला असे वाटते की असे कृतघ्न लोक आजूबाजूला आहेत म्हणून सज्जनपणा हा दुर्गुण ठरत नाही! सज्जन लोक जगात आहेत म्हणून हे जग सुंदर आहे! वाईट पणाच्या या दलदलीत मोठ्या मनाची सज्जन माणसे कमळाप्रमाणे वावरत असतात म्हणून माणसातली माणुसकी जिवंत आहे अन्यथा हे जग नरक म्हणून ओळखले गेले असते! तेंव्हा स्वच्छ नजरेने माणसे पारखायला शिकायला हवे आपल्यातला चांगुलपणा योग्य माणसांसाठीच वापरला जातो आहे ना हे आजच्या जगात तपासून घ्यायला हवे कुणी आपल्याला त्याच्या स्वार्थासाठी वापरून तर घेत नाही ना, हे सजगपणे पहायला हवे! अन्यथा चांगल्या माणसांचा चांगुलपणावरचा विश्वास उडून जाईल!
आपल काय मत आहे?
.............प्रल्हाद दुधाळ.